पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?
वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे पहाणे म्हणजे गुणमेलन. पत्रिका-गुणमेलन करताना वर्णगुणाला १, वैश्यगुणाला २, तारागुणाला ३, योनिगुणाला ४, ग्रहमैत्री गुणाला ५, गणगुणाला ६, राशीकूटगुणाला ७ आणि नाडीगुणाला ८ अशा चढत्या क्रमाने गुण दिलेले असून सर्व गुणांची बेरीज ३६ होते. हे सर्व गुण वधू-वरांच्या पत्रिकेत चंद्र कुठल्या नक्षत्रात कितव्या चरणात आहे यावर ठरलेले असते. त्यासाठी पंचांगात रेकनर सारखे कोष्टक असते. ते पाहून ३६ पैकी १८ पेक्षा अधिक गुण जमले तर विवाह जमवण्यास हरकत नाही असा निकष असतो. खरं तर या गुणमेलनात फक्त चंद्राचाच विचार होतो म्हणून ते परिपूर्ण किंवा ' शास्त्रीय ` नाही असे काही ज्योतिष्यांचंच म्हणणं आहे. एकंदरीत, परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमात कुठल्या टॉपिकला किती गुण हे जसे दिलेले असते तसाच इथे प्रकार आहे. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली असावी. प्रेम, त्याग, सांमजस्य, या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनास पोषक असतात. दोन भिन्न प्रकृतीची माणसं जर एकत्र आली तर वैवाहिक जीवनाचा समतोल ढासळतो. तसे होउ नये म्हणून त्यांच्या प्रकृतीचे मूल्यमापन पत्रिकेच्या माध्यमातून करून त्याचा निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न गुणमेलनाद्वारे केला गेला असावा.
स्त्रोत - येथे पहा.