विवाह जुळवण्याचे वेळी पत्रिका बघावी का?
महात्मा फुल्यांनी गेल्या शतकात एक प्रश्न केला होता की 'आपल्याकडे पत्रिका पाहून लग्न करूनही बालविधवांचे प्रमाण जास्त का ? इंग्लंड, अमेरिकेत तर पत्रिका वगैरे न बघता विवाह करतात तरी तिकडे हे प्रमाण जास्त नाही.` याचे कारण साधे आहे. आपल्याकडे बालविवाहाची प्रथा व बालमृत्यूचं प्रमाणही जास्त असल्यामुळे साहजिकच बालविधवांचे प्रमाण जास्त होतं. पण त्याचा संबंध ज्योतिषाशी नाही. पत्रिका न पहाता लग्ने झाली असती तरी हेच प्रमाण राहिले असते. प्रश्न हा आहे की पत्रिका पाहून लग्न झालेल्या मुलींच्या नशिबी वैधव्य येत नाही असे दिसते का ?
कालानुरूप पत्रिका गुणमेलनाची चिकित्सा होत गेली व त्यातील निष्फळता सुजाण लोकांच्या ध्यानात येवू लागली. छत्तीस गुण जुळूनही मने न जुळल्याने अयशस्वी ठरलेल्या वैवाहिक जीवनाची उदाहरणे दिसू लागली. उलट, पत्रिका न जुळताही समाधानी वैवाहिक जीवन जगणारी माणसं दिसू लागली. या संदर्भात सुप्रसिद्ध लेखक डॉ अनिल अवचट एकदा म्हणाले, ''सुनंदाशी माझं लग्न होण्यापूर्वी घरच्या मंडळींनी पत्रिका जुळते का नाही हे परस्परच बघितलं. वडिलांना एका ज्योतिषाने सांगितलं कि मुलीची पत्रिका जुळत नाही, तुम्ही हे लग्न जुळवू नका, अरिष्ट आहे. परंतु घरच्यांचा विरोध पत्करून मी हे लग्न केलं. आता मला असं वाटतं की मी आयुष्यातला एकमेव महत्वाचा योग्य निर्णय घेतला होता.
परंतु आजही समाजात उच्च शिक्षित वर्गातही पत्रिका जुळण्याचे फॅड गेलेले नाही. "त्या रावनं बघा पत्रिका न बघता लग्न केलं, प्रेमविवाह ना! बसलाय आता बोंबलत. बुद्धीवादी ना! " तो जाडया माहीतीये का? अरे त्याने रूपावर भाळून लग्न केलं, तरी आई सांगत होती चांगल्या ज्योतिषाला पत्रिका दाखव म्हणून ! पण नाही, अरे जवानी में तो गधी भी सुंदर दिखती है । आता म्हणतोय आईच ऐकलं असतं तर बरं झालं असतं.
'वालावालकरांच्या मुलाच्या लग्नाचे वेळी ज्योतिषाने सांगितलं होत कि हे लग्न ठरवू नका. कुटुंबातील व्यक्तिच्या जीवाला धोका आहे. वालावालकरांनी दुर्लक्ष केले व लग्न ठरवले. आणि काय सांगू लग्नाच्या ऐन मुहूर्तावर नवऱ्या मुलाचा सख्खा भाऊ अपघातात गेला. मी स्वत: डोळयांनी बघितलेली हकिगत आहे.` 'अहो मुलगी लग्नानंतर आपल्या बॉयफ्रेण्डबरोबर पळून गेली.` 'थोडक्यात वाचलो! ज्योतिषानं सांगितलं होतं मुलीचं कॅरॅक्टर बघा. नीट चौकशी केली तेव्हा कळलं की तिचं कॉलेजमधल्या मुलाबरोबर लफडं आहे म्हणूनं.` 'मुलगा दिसायला वागायला स्मार्ट उच्चशिक्षित, पण ज्योतिषानं सांगितले की मुलगा बाहेरख्याली वाटतो आणि तस्सच निघालं.` अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्या कानावर पडत असतात. ती खोटी असतात अशातला भाग नसतो.
अयशस्वी वैवाहिक जीवनाचं वाढलेलं प्रमाण, घटस्फोट इ. गोष्टी मनावर ताण निर्माण करतात. पत्रिका-मेलन मनाला आधार देतं. तो आधार तर्कबुद्धी किंवा विज्ञान देत नाही. पत्रिका-मेलन करूनही वैवाहिक जीवन अयशस्वी झालं तर ' आपण आपल्याकडून काळजी घेतली होती शेवटी नियतीची इच्छा! ` असं म्हणून मानसिक आधार मिळवला जातो. लग्नाच्या गाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात. एक प्रथितयश ज्योतिषी श्री.श्री. भट हे आपल्या 'ज्योतिषाच्या गाभाऱ्यात` या पुस्तकात म्हणतात, '' विवाह पहाताना ठरविताना पत्रिका पाहणार नाही असा प्रचार केला जातो. तरुणांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. वैवाहिक जोडीदार कोण असणार हे अटळ प्रारब्ध असते त्यात ज्योतिष हे निमित्त असते. `` तर दुसरे मान्यवर ज्योतिषी श्री. व.दा.भट म्हणतात, '' मी स्वत: ज्योतिषी असलो तरी एक गोष्ट प्रंाजलपणे कबूल केली पाहिजे की वधूवरांची कुंडली जुळते अगर जुळत नाही या बद्दल हमखास अनुभवास येतील असे, ज्यावर पूर्ण विसंबून रहावे असे कोणतेही नियम नाहीत. पत्रिका जुळते अगर जुळत नाही या शब्दांना वास्तविक अर्थ नाही. ( संदर्भ 'भाग्य` दिवाळी ९७ )
पत्रिका कुठल्या कारणासाठी बघितली जाते ते आपण पाहिले. पण पत्रिकेवरून वजन, उंची, छाती, शिक्षण, विचारश्रेणी, अर्थिक क्षमता, रक्तगट, आरोग्य इत्यादि गोष्टी अजिबात समजत नाहीत. त्यामुळे पत्रिका बघण्यात काही अर्थ नाही. मात्र विवाह जुळवण्याची पद्धत जरूर विचारात घ्यावी. कारण प्रेमविवाहांची संख्या जशी वाढलीय् तशी घटस्फोटांची संख्याही वाढलीय्. शारिरिक आकर्षणातून निर्माण झालेलं प्रेम हे तकलादू असतं. त्यात विवेकापेक्षा भावनेचा पगडा जास्त असतो. तर दुसरीकडे सध्या प्रचलित असलेली विवाह जमवण्याची रीत ही एक प्रकारच्या जुगारासारखी आहे. तिच्यात केवळ व्यावहारिक गोष्टींसाठी बायोडाटा देतात व 'स्थळ बघण्याचा` कार्यक्रम होतो. त्यात मुलगा-मुलगी एकमेकांना थोडेबहुत प्रश्न विचारतात.यातून एकमेकाच्या व्यक्तिमत्वाचा काय अंदाज येणार? तसं ही 'माणूस` ओळखणं हे अवघडच काम. एकमेकाच्या सहवासात जन्म काढूनही परस्परांची खऱ्या अर्थानं ओळख न झालेली माणसं आढळतात. तिथं आपल्या आयुष्याचा साथीदार इतक्या तकलादू पद्धतीने निवडणे कितपत उचित होईल ? परिचयोत्तर विवाह हा एक चांगला पर्याय होउ शकेल. मैत्रीतून स्वभावाविषयी थोडाफार तरी अंदाज आलेला असतो. त्यामुळे अशा रितीने होणारा विवाह हा जुगार ठरण्याची शक्यता कमी. पण शेवटी, मैत्री आपल्या जागी रहाते व विवाह आपल्या जागी रहातो. विवाह ही व्यावहारिक बाब आहे. नुसत्या उदात्त कल्पनेने वैवाहिक जीवन काही जगता येत नाही. सांपत्तिक स्थिती, स्थावर, मानलौकीक, कौटुंबिक स्थिती या गोष्टी वा व्यावहारिक गरजा ही महत्वाच्या आहेत. फिल्मी स्टाईल प्रेमाच्या व त्यागाच्या बाता व्यवहारात कुचकामी ठरतात हे ध्यानात आल्यावर भ्रमनिरास होउन विवाह अयशस्वी ठरतात. म्हणूनच 'घटस्फोट मिळेल का?` असे ज्योतिषाकडे विचारायला जाणारा वर्ग वाढलाय. विवाह हा संस्कार न ठरता सोपस्कार व्हायला लागला आहे. आमच्या मते विवाह जुळवण्यासाठी पत्रिका पहाणे निरर्थक आहे.
स्त्रोत - येथे पहा.