ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना बुद्धी असते ही गोष्ट मान्य करावी लागेल. कारण ती असल्याशिवाय त्यांची शांती कशी होणार ? ग्रहांना मानवी भाव-भावना, राग-लोभ वगैरे असतात अशा श्रद्धा पूर्वीपासूनच लोक बाळगत आलेले आहेत. ग्रहांना देवताच मानत असत. अनिष्ट ग्रह बिघडलेले ( म्हणजे रागावलेले ) असले तर त्यांना शांत करण्यासाठी ग्रह-जप, दानधर्म, शांति-कर्मे यांची योजना पूर्वीपासून हे लोक करत आले आहेत. ग्रहांना माणसाप्रमाणे मन व बुद्धी आहे हे गृहीत धरूनच हे उपाय करण्यात येतात की नाही? नेमाने शनीमहात्म्य वाचल्याने, शनिवारी तेल व रुईची फुले शनीला वाहिल्याने शनी त्याची पीडा सौम्य करतो अशी श्रद्धा हे लोक ठेवतातच ना ? शनीला मन व बुद्धी असल्याशिवाय त्यांनी ही श्रद्धा ठेवली असती का ? वेदकाळापासून गायत्री मंत्र लोक कशासाठी जपत आले आहेत ? सूर्याने त्यांच्या बुद्धीचे प्रचोदन करावे म्हणूनच ना? सूर्याला बुद्धीच नसेल तर तो माणसांच्या बुद्धीला कशी प्रेरणा देईल ? म्हणून, परंपराभिमानी लोक जर प्रामाणिक असतील तर ग्रहांना बुद्धी असते हे विधान त्यांनी मान्य करायलाच हवे. हे विधान तुमच्या बुद्धीला पटते का ते प्रथम विचारा. श्रद्धाळू लोकांना असे वाटते की फायदा झाला तर शांती उपासना केल्याने झाला. जर फायदा-नुकसान काहीच झाले नाही तर 'नुकसान झाले नाही हा फायदाच म्हणायचा नाही का?` अशी समजूत करून घेतात. नुकसान झाले तर आपली श्रद्धा वा उपासना कमी पडली किंवा आपला कर्मभोग असे समजतात. एकूण काय तर फायदा-तोटयाची परिमाणे लोकांच्या श्रद्धाळूपणातच दडलेली असतात.
स्त्रोत - येथे पहा.